नवी दिल्ली – दिल्ली दंगलींच्या विषयावर तातडीने चर्चा सुरू करा या मागणीसाठी कॉंग्रेस व अन्य विरोधी सदस्यांनी सभागृहात गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकुब केले. ही संसद आहे बाजार नव्हे असे अध्यक्ष नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या सभासदांना समजून सांगितले पण तरीही हा गदारोळ थांबला नाही.
तहकुबी पुर्वी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील करोना स्थितीच्या संबंधात निवेदन केले. त्यानंतर अध्यक्षांनी शुन्य प्रहाराचा कार्यक्रम पुकारताच विरोधी सदस्यांनी गदारोळाला सुरूवात केली. त्यांच्यापैकी काही सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापुढे येऊन गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करीत घोषणाबाजी केली.
या सदस्यांना जागेवर जाऊन बसण्याची सुचना अध्यक्षांनी केली व प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याची सुचना केली पण त्याला विरोधी सदस्यांनी दाद न दिल्याने कामकाज तहकुब करावे लागले. तत्पुर्वी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी सभागृहात सांगितले की, दिल्लीतील दंगलीच्या संबंधात चर्चा झाल्याशिवाय आम्ही सभागृहातील कोणतेही कामकाज चालवू देणार नाही अशी आम्ही भूमिका जाहीर केली आहे. तथापी देशातील करोना विषाणुंच्या प्रसाराच्या संबंधात गंभीर स्थिती उद्भवली असल्याने आम्ही आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना त्यांचे निवेदन सादर करण्याची अनुमती देण्यास तयार आहोत. त्यानुसार हर्षवर्धन यांनी त्यांचे निवेदन सभागृहात सादर केले.
या निवेदनाखेरीज आम्ही अन्य कोणतेही कामकाज चालवू देणार नाही असे गुलाम नबी आझाद यांनी सांगताच अध्यक्षांनी त्यांना बजावले की सदस्यांच्या सुचेनुसार या सभागृहाचे कामकाज चालणार नाही.