कोल्हापूर (प्रतिनिधी) – कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा न झाल्यास क्रांतिदिनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना विनाअट प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान द्या. तसेच उसाचा दुसरा हप्ता 200 रुपये द्यावा. रासायनिक खतांचे दरवाढ त्वरित मागे घ्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
“कोण म्हणतय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. बुधवारी भर पावसात निघालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माजी खासदार शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
संसदेत आता भ्रष्ट, जुमलाजीवीसारख्या शब्दांवर बॅन
शेट्टी म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, पण त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच निघून गेले. आज छत्र्या घेऊन आलो आहे, उद्या याचे भाले होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे शेतीत काम केलेले फोटो पाहिले आहेत, पण केवळ फोटो टाकू नका. पहिल्यांदा शेतकऱ्यांचे पैसे द्या. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
“अतिवृष्टीमुळे जनता हैराण; नवीन सरकार मात्र मंत्रीमंडळ विस्तारातच व्यस्त”