कोल्हापूर (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ न करता त्याची सक्तीने वसूल करा, असं भाष्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केल्यानंतर राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी नितीन राऊत यांना सज्जड इशारा दिला आहे. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले कदापि भरणार नाही, सरकारने सक्तीने वसूल केल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ते कोल्हापूरात बोलत होते.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घरगुती वीज बिले वसूल केले जाईल, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, वीज बिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय? नितिन राऊत यांना जर कोणतेही अधिकार नसतील तर पोकळ घोषणा करू नयेत, या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद होते. कुणाच्या हाताला कामे नव्हती. गोरगरीबांकडे पैसा नाही. ही वीज बिले भरायची कशी? सर्वसामान्य माणसाला सरकारने घरात कोंडून ठेवले होते. लोकांकडे पैसे नाहीत म्हणून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत अशी आमची माफक मागणी आहे. मात्र वीज वितरण कंपनीने वसुली करण्यास सुरूवात केली आहे.
केंद्र सरकारने काहीसे पॅकेज दिले, मात्र राज्य सरकारने जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी यापुढे कोणतीही घोषणा करताना वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच जनतेला आश्वासने द्यावीत, सरकारने त्वरीत वीज बिले माफ करावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारशी दोन होत करू, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.