पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुणे येथे खा. शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी त्यांची सौजन्य भेट घेतली. त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळही उपस्थित होते. महाराष्ट्रात सध्या चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या बैठक वाढल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला मतदारांनी कौल देऊन देखील हे दोन्ही पक्ष राज्यात स्थिर सरकार देण्यास अपयशी ठरले. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून राज्यात नवीन महाशिवआघाडी निर्माण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
राजू शेट्टी यांनी शरद पवारांची भेट का घेतली हे अजून अधिकृतरित्या समजले नाही. पण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत राजकीय धोरणासंदर्भात पवार आणि शेट्टी यांच्यात चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.