कडकनाथ फसवणूक प्रकरणी केली चौकशीची मागणी
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले जात आहे. पण स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मात्र स्वत:च बॅलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयात पोहोचले. यावेळी कडकनाथ कोंबडी प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास 500 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कडकनाथ संबंधीची कंपनी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. यावरुन राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे.