मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अपयशाचा सामना करावा लागला होता. या बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी कोहलीने त्याचे लहानपणीचे मूळ प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याशी संवाद साधला असून लवकरच तो त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहे.
रनमशीन म्हणून नावाजला जात असलेला कोहली न्यूझीलंडमध्ये धावांसाठी झगडताना दिसला व लगेच समीक्षकांनी त्याच्यावर टीकेचा सूर आळवायला सुरुवात केली. कोहलीने खेळलेल्या गेल्या 22 डावात एकही शतक फटकावता आलेले नाही. न्यूझीलंड दौऱ्यात टी-20, एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि कसोटी मालिका यात पूर्वीचा कोहली दिसलाच नाही. अपयशाने त्रस्त झालेल्या कोहलीने आपले पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याशी संपर्क केला असून आता तो गो बॅक टू द बेसिक्स या उक्तीनुसार सराव करणार आहे.
विराट सध्या बॅडपॅचमधून जात आहे. मात्र त्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्याने पुन्हा एकदा नेटमध्ये सराव केला तर त्याच्या चुका त्यालाच लक्षात येतील. तो पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा यश मिळवेल, असे शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कोहलीचा स्वभाव आक्रमक आहे, पण म्हणून त्याने कोणाचे नुकसान केले नाही. तो आक्रमक नव्हे तर स्पष्टवक्ता आहे मी त्याला तो लहान असल्यापासून ओळखत आहे. सध्या त्याच्या धावा होत नाहीत त्यामुळे समीक्षकांना आयतेच खाद्य मिळाले असून ते विनाकारण त्याला लक्ष्य करत आहेत. ज्या फलंदाजाने संघाला विजय मिळवून दिले आहेत, कारकिर्दीत अनेक विक्रम साकार केले आहेत, त्याच्या गुणवत्तेवर शंका घेणे योग्य नाही, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले.