राजकोट : येथील शासकीय रुग्णालयात 2019च्या अखेरच्या तीन महिन्यात 269 अर्भकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू डिसेंबर महिन्यात झाले आहेत.
राजकोट शासकीय रूग्णालयात ऑक्टोबरमध्ये 87 तर नोव्हेंबरमध्ये 71 अर्भकांनी प्राण गमावले. डिसेंबेरमध्ये हाच आकडा 111वर पोहोचला होता, अशी माहिती या रुग्णालयाचे प्रमुख मनिष मेहता यांनी दिली.
रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांअभावी हे मृत्यू घडल्याचे सांगण्यात आले. मेहता म्हणाले, आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी आमच्याकडे पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने 500 खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याच्या कामास सुरवात केली आहे, असे मेहता म्हणाले.
दरम्यान, बडोद्यात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडे या प्रश्नाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिला.