नवी दिल्ली: शारदा चिटफंड प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून सात दिवसांचे संरक्षण दिले आहे. ते वाढवून मिळावे म्हणून राजीवकुमार यांनी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा तातडीचा विषय असल्याने तो सुटीकालीन न्यायाधिश इंदिरा बॅनर्जी आणि संजीव खन्ना यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राजीवकुमार यांना सात दिवसांची सवलत देऊन त्या अवधीत संबंधीत कोर्टात जाऊन जामीन मिळवण्यास अनुमती दिली होती. 17 मे रोजी ही अनुमती देण्यात आली असली तरी कोलकात्यातील कोर्टांमध्ये सध्या संप सुरू असल्याने त्यांचे कामकाज सध्या होत नाहीं त्यामुळे सात दिवसांच्या अटकेपासूनच्या संरक्षण अवधीत वाढ केली जावी अशी मागणी त्यांच्या वकिलांच्यावतीने खंडपीठाकडे करण्यात आली आहे. आमचे या अवधीत तीन दिवस आधीच वाया गेले आहेत. तथापी तीन न्यायाधिशांच्या खंडपीठाने त्यांना ही सात दिवसांची मुदत दिल्याने त्यावर सरन्यायाधिशच निर्णय घेऊ शकतील त्यामुळे आपण न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जाऊन त्यांच्याकडून या विषयावर सुनावणी घेण्याची विनंती करा अशी सुचना या सुटीकालीन खंडपीठाने केली आहे.