पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नलिनी आणि तिच्या पतीचे पत्र
चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरन आणि तिचा पती व्ही. श्रीहरन उर्फ मुरूगन यांनी दयामरण देण्याची विनंती केली आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टेच्या आत्मघाती दहशतवाद्याने घडवलेल्या स्फोटात 21 मे 1991 रोजी हत्या करण्यात आली होती. त्यात नलिनी आणि मुरूगन यांना दोषीठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. एजी पेरारीवालन, व्ही. श्रीहरन उर्फ मुरूगन, टी. सुथेंद्रराजा उर्फ सनातन, जयकुमार, रॉबर्ट पायस, विचंद्रन आणि नलिनी श्रीहरन अशी या आरोपींची नावे आहेत.
वेल्लोर येथे महिलांसाठी उभारलेल्या कारागृहात नलीनी गेली 27 वर्ष शिक्षा भोगत आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मद्रास उच्च न्यायलयालयाचे मुख्य न्यायाधिश अमरेश्वर प्रताप साही यांना पत्र पाठवून दयामरण देण्याची विनंती केली आहे, असे कारागृहाच्या सुत्रांनी सांगितले.
तत्पुर्वी तामिळनाडू मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व सातही आरोपींच्या सुटकेसाठी कलम 161नुसार अधिसुचना काढावी म्हणून राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांना आदेश द्यावेत म्हणून त्यांनी मद्रास उच्च न्यायलयात या वर्षाच्या सुरवातीला याचिका दाखल केली होती.
नलिनीने मुलीच्या विवाहाची तयारी करण्यासाठी एक महिन्याचा पॅरोल मागितला होता. त्याबात मद्रास उच्च न्यायलयाने तो पाच जुलैला मंजुरी दिल्यानंतर तिला 20 दिवसांनी सोडण्यात आले होते. त्याआधी गेल्या नोव्हेंबरमध्ये रॉबर्ट पायस आणि एजी पेरारीवालन यांना 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.