नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील रामलीला मैदानावर एका प्रचार सभेला संबोधित करताना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विराट आपल्या कौटुंबिक सहलीसाठी वापरल्याचा आरोप लावला होता. दरम्यान, पंतप्रधानांकडून लावण्यात आलेल्या या आरोपांचे भारतीय नौदलाचे माजी एडमिरल एल रामदास यांनी खंडन केले आहे. पंतप्रधानांच्या आरोपांबाबत बोलताना भारतीय नौदलाचे माजी एडमिरल एल रामदास यांनी सांगितले की दिवंगत पंतप्रधानांनी कधीही आयएनएस विराटचा सुट्टी व्यतीत करण्यासाठी वापर केला नाही.
भारतीय नौदलाचे माजी एडमिरल एल रामदास यांच्यासोबतच नौदलाच्या आणखी चार अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या कालच्या दाव्याचे खंडन केले आहे. एल रामदास यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ‘काल मोदींतर्फे दावा करण्यात आलेला दौरा कौटुंबिक नसून तो एक शासकीय दौरा होता आणि राजीव गांधी या दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत कोणतेही मित्र अथवा परदेशी पाहुणे नव्हते.’
भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त वाईस एडमिरल आणि त्यावेळीच आयएनएस विराटचे कमांडिंग ऑफिसर विनोद पसरीचा यांनी देखील मोदींचे कालचे आरोप स्पष्टपणे फेटाळले असून ते म्हणतात, ‘राजीव गांधींचा तो दौरा पूर्णपणे शासकीय होता त्यामध्ये सुट्ट्यांचा काहीही संबंध नाही.’
भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांनीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर लावलेल्या आरोपांचे खंडन केले असल्याने पंतप्रधान मोदींच्या आरोपांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.