नवी दिल्ली – राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन हिने आपल्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नलिनी हीने सुटकेसाठी या पुर्वी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती पण तिची ही याचिका फेटाळण्यात आल्याने ती आता सुप्रिम कोर्टात गेली आहे. अशा प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या कक्षेत येत नाही असे नमूद करून उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळली होती.
घटनेच्या कलम 142 नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करून, सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी याच हत्या प्रकरणातील आरोपी पेरारिवलन यांना सोडण्याचे आदेश दिले होते, पेरारीवलने 30 वर्षांपेक्षा जास्त कारावास भोगला आहे.
राजीव गांधींची 21 मे 1991 च्या रात्री तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक सभेत धनू नावाच्या एका महिला आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली आहे. या प्रकरणात पेरारिवलन, मुरुगन, संथन आणि नलिनी या चार आरोपींनी या कटात सक्रिय सहभाग दिला होता त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली होती. मे 1999 च्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.
तथापि, 2014 मध्ये, त्यांनी दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास 11 वर्षांचा विलंब झाल्याच्या कारणाने पेरारिवलनच्या फाशीची शिक्षा संथन आणि मुरुगन यांच्याप्रमाणेच जन्मठेपेत बदलण्यात आली आहे. नलिनी हिला मुलगी असल्याच्या कारणावरून 2001 मध्ये तिची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली आहे.