राजगुरूनगर – महिलांवर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्या शुक्रवारी (दि १३) रात्री आठच्या दरम्यान वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. या बिबट्याने तालुक्यातील तीन महिलांवर जीवघेणा हल्ला केला होता. गेली काही दिवसांपासून रेटवडी परिसरातील गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यात रेटवडी व जऊळके खुर्द या दोन गावात तीन महिलांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली होती.
नरभक्षक झालेल्या हा बिबट्या या शिवारात शिवारात दबा धरून बसलेला होता. वनविभागाकडून त्याला जेरबंद करण्याचे शिताफीने प्रयत्न सुरु होते. अखेर हा बिबट्या ४८ तासांत जेरबंद करण्यात राजगुरूनगर वनपरिक्षेत्र विभागाला यश मिळाले आहे. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
मंगळवारी दि.१० रोजी रेटवडी गावात दोन वेगवेगळ्या ठिकाणी व वेळी दोन महिलांवर हल्ले झाले होते. गुरुवारी सकाळी जऊळकेत हल्ला झाला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गेले ४८ तास ड्रोनद्वारे परिसरात टेहळणी केली होती. त्यात जऊळके येथे महिलेवर हल्ला झाला त्या ठिकाणी शेतात बिबट्या असल्याचे दिसून आले होते.
या भागात मोठ्या क्षेत्रात संपूर्ण जाळी लावून बाहेर पडण्याच्या मार्गावर पिंजरा लावण्यात आला होता. रात्री आठ वाजता बिबट्या त्यात अडकला. अडकल्यावर त्याने डरकाळ्या फोडल्या मात्र नागरिकांना काळण्या आगोदर बिबट्याला हलविण्यात आले. त्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात येथे नेण्यात आले. रेटवडी आणि जऊळके येथील दोन महिलांवर झालेल्या जीवघेणा हल्ल्यात साम्य होते. म्हणून पिंजऱ्यात आलेला हा बिबट्या तोच असावा असा वनविभागाचा कयास आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौन्धळ, दत्तात्रय फापाळे, शिवाजी राठोड, संदीप अरुण यांनी कारवाई पथकात सहभाग घेतला.
दरम्यान रेटवडी गावाच्या परिसरात बिबट्यांचे वेगवेगळ्या दिवशी दोन हल्ले केले होते. त्यावरून परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याशिवाय आठवड्यापूर्वी रेटवडी आणि जऊळके च्या मध्यावर असलेल्या चासकमान डाव्या कालव्याच्या पुलावर काही नागरिकांनी रात्री चार बिबटे व दोन बछडे पाहिले होते. त्यामुळे बिबट्याची दहशत कायम आहे.