राजगुरूनगर – खेड तालुक्यातील पूर्व भागात महावितरणच्या तुघलकी कारवाई विरोधात महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी पशुधनासह मोर्चा काढून व धरणे आंदोलन केले.
शेतीसाठी वीज बिल न भरल्याने वीज जोड तोडण्याचा महावितरणने सपाटा लावल्याने शेतकऱ्यांचे घरगुती, शेतीचे प्रश्न गंभीर बनले आहेत. जनावरांना चारा, पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक होवून बैल, शेळ्या-मेंढ्या आदी पशुधन सोबत आणून राजगुरूनगर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर सोमवारी (दि. 28) मोर्चा आणून कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
काळूस, शेलपिंपळगाव, रासे, भोसे आदी भागात महावितरण कंपनीने कृषीपंपांचा वीजपुरवठा बेकायदा खंडीत केला, कृषीपंपाना लाखो रुपयांची खोटी वीजबिले दिली आहेत. करोनाचा काळ असल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्यातच लाखो रुपयांची वीज बिले पाठवण्यात येतात, त्यामुळे थकबाकी वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिले भरली आहेत त्यांच्या कृषीपंपाना रात्री वीजपुरवठा केला जातो, त्यामुळे पाणी भरण्यास अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे शिवाजीनाना नांदखिले यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेच्या वर्षा काळे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती ज्योती अरगडे, वस्ताद शेतकरी संघटना अध्यक्ष सुभाष पवळे, वस्ताद दौंडकर, सुनील पोटवडे अमोल मोहिते, अप्पा दिघे, सुनील पोटवडे, बाळासाहेब दौंडकर, परशुराम खैरे, सूवर्णा पठारे, संगीता दरेकर, समाधान भाडळे, कैलास बवले, विश्वास नेहरे, बबनराव पवळे, सीता पानसरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी पशुधनासह उपस्थित होते. यावेळी महावितरण व शासनाच्या या धोरणाचा निषेध करीत जोरदार घोषणा दिल्या.