सांडपाणी, कचरा विल्हेवाट आणि वाहतूक कोंडी हे तीन प्रश्न ऐरणीवर
राजगुरूनगर/दावडी – राजगुरूनगर शहर समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध कारणांमुळे नागरिकांच्या गैरसोयींमध्ये वाढ झालेले चित्र सध्या पाहायला मिळते.
पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर हे एक पुण्यापासून जवळ असलेले शहर म्हणून ओळख आहे. त्यातच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ म्हणून जुने खेडचे राजगुरूनगर असे नामकरण करण्यात आले. तालुक्यात येत असलेल्या नवनवीन प्रकल्पांमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होत चालला आहे.
पूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजगुरुनगर शहरातील सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात होत्या. यामध्ये पिण्याचे फिल्टर पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, कचरा यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रथम लक्ष पुरवले जात होते. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे नागरी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होत होत्या; परंतु वाढत्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्नही अपुरे पडू लागले.
त्यानंतर राजगुरुनगरची ग्रामपंचायत ही नगरपरिषद झाली. नगर परिषद झाली म्हटल्यावर सुख सोई मिळणार, नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लागणार अशी भावना नागरिकांनमध्ये झाली; मात्र राजगुरुनगर शहरातील सुविधा पुरवण्यासाठी नगरपरिषदेची काहीशी दमछाक होतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा, सांडपाण्याचा प्रश्न, कचऱ्याची विल्हेवाट, फुटलेल्या जलवाहिन्या त्यातून रस्त्यालगत येणारे पाणी हे प्रश्न आव्हान बनू लागले आहेत.
ते सोडवण्यासाठी नगर परिषदेकडून प्रामाणिक प्रयत्नही झाले; परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे नगरपरिषद ते प्रयत्न अपुरे पडू लागले आहेत. त्यातच काही नागरिकांची बेपर्वाई त्यामुळे नागरी प्रश्नांची सोडवणूक करणे अवघड बनत चालले आहे. घंटागाडी सोडून बाहेर टाकला जाणारा कचरा त्यातच उघड्यावर असलेल्या गटारातील सांडपाणी हे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येणारी दुर्गंधी, उघडी तुंबलेली गटारे या सर्वांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपुरी स्वच्छतागृह त्यांची झालेली दुरवस्था, हाही नगरपरिषदेच्या प्रश्न सुटू शकलेला नाही.
सांडपाणी सरळ नदीत मिसळून भीमा नदीचे पाणी दूषित होते. त्यामुळे नदीकाठच्या पुढील गावच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कचरा उचलण्यासाठी नगरपरिषद घंटागाडी असली तरी अजून व्यापक प्रयत्न व नागरिकांमध्ये शिस्तीची गरज आहे.
वाहतूककोंडी ठरतेय डोकेदुखी
सांडपाणी आणि कचरा विल्हेवाट आणि शहरातील वाहतूक कोंडी हे तीन प्रश्न ऐरणीवर असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी ही राजगुरुनगरची खरी डोकेदुखी आहे. राजगुनगर वाहतूक कोंडीच्या विळख्यात का अडकले याचे उत्तर द्यायचे झाल्यास अतिक्रमण असेच द्यावे लागेल. बाजारपेठेत, वाडा रोड, तिन्हेवाडी रोड, पाबळ रोड, जुना मोटर स्टॅंड या परिसरात नियम डावलून अतिक्रमणे करण्यात आली आहेत; मात्र या गोष्टीकडे डोळेझाक होत आहे.
अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीच्या विळख्यात राजगुरूनगर शहर अडकले असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. गडई मैदानवरून रस्ता तसेच क्रीडा संकुलच्या बाजूनेही रस्त्याची सोय केली आहे; परंतु गावातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे हटवणे, नो पार्किंग करणे, वाहने रस्त्यावर लावणे, व्यवसायिक रस्त्यालगत बसणे यांच्यावर कठोर निर्बंध लावणे गरजेचे आहे.
एकत्रित या, समस्या सोडवा
राजगुरुनगर शहरातील समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषद, नागरिक, पोलीस आणि महसूल व बांधकाम विभाग अधिकारी व पदाधिकारी यांच्या एकत्रित येण्याची खरी गरज आहे. यातूनच राजगुरुनगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा अतिक्रमणाचा प्रश्न व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यात मदत होणार, हे मात्र निश्चित!