राजगुरूनगर – येथील एसटी बस स्थानकात पावसामुळे पाण्याचे तळे साचले आहे. स्थानकातील रस्त्यावर खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रवशांना हे खड्डे दिसत नसल्याने प्रवासी धडपडत आहेत. याचा सर्वाधिक त्रास पुणे-नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
उन, वारा आणि पावसात या स्थानकात उघड्यावर प्रवाशांना बसेसची वाट पहावी लागते, या प्रश्नांकडे महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी वर्गात नाराजी आहे. राजगुरूनगर येथील एसटी बस स्थानक पुणे-नाशिक आणि मुंबई येथे जाण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. दररोज बस स्थानकात 500 पेक्षा अधिक बसेस ये-जा करतात. मात्र, राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या आवश्यक सुविधांकडे लक्ष दिले जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरूनगर आगारात पुणे-नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म नाही. नागरिकांना उन्हात पावसात मोकळ्यावर उभे राहावे लागत आहे. बसची वाट पाहण्यासाठी उभ्या असलेल्या जागेवर रस्ता दिसत नसून केवळ पाण्याचे तळेच दिसत आहे. थोडासा जरी पाऊस झाला तरी या ठिकाणी तळे साचत आहे.
आगारातील इतर जागेत बस उभ्या असल्याने व अनधिकृत वाहने उभी असल्याने बसचालकाला नाईलाजाने पाणी साचलेल्या जागेत बस उभी करावी लागते. येथील एसटी स्थानकात मोठ्या प्रमाणात पार्किंग आहे. अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई केली जात नाही. या ठिकाणी साचलेले पाणी पार्किंग असलेल्या बाजूकडून ओढ्यात सोडले जाईल; मात्र केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथे पाणी साचून प्रवाशांना अडचण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षीच अशी परिस्थिती निर्माण होत तरी ती सुटत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
“समस्या “जैसे थे’
राजगुरूनगर आगाराचे नुतनीकरण करण्यात आले; मात्र परिसरातील प्रश्न सोडविण्यात आले नाहीत. जवळपास 70 लाख रुपयांचा निधी आला. तरीदेखील आगारातील समस्या कायम आहेत.
पुणे-नाशिक बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांना उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी व बसण्यासाठी बाकडे टाकून त्यावर शेड करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्याठिकाणी साचलेले पावसाचे पाणी बाजूला सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात येथे मुरूम टाकण्याची व्यवस्था केली जाणार आहे, जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही.
– रमेश हांडे, आगार प्रमख, राजगुरूनगर