औरंगाबाद -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत प्रथमच औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख केला होता. तेव्हा पासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या तोंडून या शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मुंबईत औरंगाबादच्या नामांतराची आठवण करून दिली त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. अशातच राष्ट्रवादीने नामांतरावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी संभाजीनगरचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नसल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राजेश टोपे म्हणाले, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचे महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझे व्यक्तिगत मत देणे योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्यावर विषय नाही, आमच्या पक्षाच्या तर आजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो, असे वक्तव्य टोपे यांनी केला आहे.आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि अन्य प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीकडे आपण लक्ष देऊ, असेही टोपे म्हणाले आहेत.