पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव
जयपुर: राजस्थान मधील कॉंग्रेस सरकार मध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या दोन गटांमधील संघर्षात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गटाची सरशी झाल्याचे आजचे चित्र होते. राजस्थान विधीमंडळ कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत सर्व उपस्थितीत आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत सरकारला पुर्ण पाठिंबा व्यक्त करीत पक्षाच्या नेतृत्वाच्या बरोबरच कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ज्या कॉंग्रेस आमदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात कठोर शिस्तभंग कारवाई करण्याची मागणीही या बैठकीतील ठरावात करण्यात आली आहे. पक्षाच्या एकूण 107 आमदारांपैकी शंभरावर आमदार आपल्या बरोबर असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला असून हे सर्व आमदार गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते.
राज्यातील कॉंग्रेस सरकार कमकुवत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्वच घटकांचा यावेळी निषेध करण्यात आला. जो कोणी पक्ष पदाधिकारी किंवा कॉंग्रेस आमदार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारच्या विरोधात कारवाया करीत असेल किंवा सरकार विरोधी कटात सहभागी असेल तर त्यांच्यावरील कारवाईच्या प्रस्तावाला उपस्थित सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला आहे.
यातून आता कॉंग्रेस कडून सचिन पायलट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. सचिन पायलट हे उपमुख्यमंत्री असून ते प्रदेशाध्यही आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने ही दोन्ही पदे सोडावी लागतील असे सांगितले जात आहे.
दरम्यान कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षकही जयपुरला हा पेच सोडवण्यासाठी आले असून त्यांनी दोन्ही गटांमध्ये पुन्हा समेट व्हावेत असे प्रयत्न केले. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी आज जयपुर मध्ये पत्रकारांशी बोलताना सचिन पायलट यांनी पुन्हा पक्षात परत येण्याचे जाहीर आवाहन केले. आपसातील मतभेद आपण चर्चेद्वारे सोडवू, आपण पक्षाचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा करू शकता आपल्यासाठी सगळी दारे उघडी आहेत असेही सुर्जेवाला यांनी पायलट यांना उद्देशून सांगितले.
सचिन पायलट यांनी मात्र आपला बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे. तथापि आपण भारतीय जनत पक्षात प्रवेश करणार नाही असे त्यांनी काही राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांशी बोलताना सांगितले. ते बहुधा स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन करणार आहेत असे सांगितले जात आहे. त्यांनी आपल्या मागे कॉंग्रेसच्या तीस आमदारांचा गट असल्याचे नमूद केले असून गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावाही पायलट यांनी केला आहे.