जयपूर – राजस्थानात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्या असून रविवारी विविध ठिकाणी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्येही कॉग्रेसनेच सर्वाधिक अध्यक्षपदे प्राप्त केली आहेत. काल एकूण 90 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्यात कॉंग्रेसला 48 ठिकाणी अध्यक्षपदे मिळाली असून भाजपला 37 ठिकाणी अध्यक्षपदे मिळाली आहेत. या 90 जागांपैकी तीन ठिकाणचे अध्यक्ष बिनविरोध निवडले गेले असून काल 87 ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला एक जागी अध्यक्षपद मिळाले आहे.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गोविदसिंह दोस्तरा यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे या अनुषंगाने अभिनंदन करताना म्हटले आहे की कॉंग्रेसने अपक्षांच्या मदतीने आपल्या अध्यक्षपदांची संख्या यावेळी 50 वर नेली असून गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या 60 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 37 जागांवरच समाधान मानावे लागले आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे कॉंग्रेसचा हा देदूप्यमान विजय ठरला आहे असे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेसने या निवडणुकांच्या माध्यमातून स्वताविषयी फाजील आत्मविश्वास दाखवला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता त्यांचा भ्रम निश्चित दूर करेल, असा दावा भाजपचे नेते सतीश पुनिया यांनी केला आहे.