जयपूर – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला राजस्थानात मोठा फटका बसला आहे. राज्यात सत्तेत असताना देखील काँग्रेसला येथील लोकसभेच्या सर्वच्या सर्व २५ जागांवर पराभव स्वीकारावा लागला असून राज्याचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हा देखील राजस्थानातील जोधपूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाला आहे.
दरम्यान, राजस्थानातील लोकसभा निवडणुकांमधील या लाजिरवाण्या पराभवाच्या जबाबदारीवरून राजस्थान काँग्रेसमध्ये सध्या दुफळी माजताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी किमान वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी तरी स्वीकारावी असं वक्तव्य केलं होतं.
अशातच आता, राजस्थानातील तोडाभीमचे काँग्रेस आमदार पृथ्वीराज मीना यांनी लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या राजस्थानातील सपशेल पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वीकारावी अशी मागणी केली आहे. यावेळी मीना यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात यावी असं आपलं वयक्तिक मतं असल्याचं देखील सांगितलं आहे.
जर पक्ष सत्तेत असेल आणि पक्षाचा पराभव झाला तर त्या पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्र्याने स्वीकारायची असते आणि जर पक्ष विरोधात असताना पराभव झाला तर त्याची जबाबदारी प्रदेश अध्यक्षाने स्वीकारायची असते असं देखील त्यांनी सांगितलं.