जयपूर -कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे राजकीय घडामोडी घडून भाजप सरकार सत्तेवर आले; तसेच राजस्थान आणि मध्यप्रदेश या कॉंग्रेसशासित राज्यांत घडू शकते, असे भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केले. राजस्थान दौऱ्यावर असणारे आठवले येथे पत्रकारांशी बोलत होते.
कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएस आघाडीच्या काही आमदारांनी बंड पुकारून राजीनामा दिला. त्या घडामोडींमुळे त्या आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्याचा संदर्भ आठवले यांनी दिला. कुठल्याही आमदाराला राजीनामा देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाहीचा विश्वासघात होत नाही, असे म्हणत त्यांनी कर्नाटकमधील बंडखोर आमदारांच्या कृतीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले. आठवले यांचे भाकीत कॉंग्रेसचे राजकीय टेन्शन वाढवणारे ठरणार आहे.