पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नारायणगव्हाण येथील कांडेकर हत्याकांडातील आरोपी राजाराम शेळके यांचा खून संग्राम कांडेकर यानेच केल्याचे उघडकीस आले. वडीलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संग्रामने तलवारीने सपासप वार करून शेळकेचा खून केला. दरम्यान, संग्रामने खूनाची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांना अटक केली आहे.
सुमारे अकरा वर्षांपूर्वी नारायणगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके याने सुपारी देऊन तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणी राजाराम शेळके याच्यासह त्याचा मुलगा राहूल व इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा भोगत असताना ते पॅरोलवर सुटले आहेत.
दोन दिवसांपूर्वी राजाराम शेळके याची हत्या झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला असता संग्राम कांडेकर हाती लागला हा प्रकार ‘खून का बदला खून’ असल्याचे समोर आले.
राजाराम शेळके याने संग्रामचे वडील प्रकाश कांडेकर यांचा खून केला होता. तेव्हापासून बदल्याची आग संग्रामला स्वस्थ बसू देत नव्हती. मात्र शेळके तुरूंगात असल्याने काहीही करता येत नव्हते. अखेर, शेळके पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याला संपविण्यासाठी संग्रामने विटा उचलला. शेळके याच्यावर काही दिवस पाळत ठेवण्यात आली. तो कुठं व कधी जातो, त्याच्यासोबत कोण असते? हे पाहून त्याने योजना आखली.
दोन दिवसांपूर्वी शेळके शेतात एकटाच जात असल्याचे पाहून संग्राम हा उसाच्या शेतात तलवार हातात घेवून दबा धरून बसला आणि संधी मिळताच पाठीमागून धावत जावून त्याने शेळकेच्या मानेवर तलवारीने वार केला. त्यात शेळके गंभीर जखमी झाला. शेळके तीन वार केल्यानंतर ठार झाल्याची खात्री झाल्यावर संग्राम हा पुन्हा उसाच्या शेतात गेला. तेथून जवळ असलेल्या ठिकाणी त्याने तलवार स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर ती तलवार एका दूध डेअरीजवळ लपवली. पुढे, तो दुचाकीवरून शिरूरला गेला. तेथे एटीएममधून पाचशे रुपये काढले आणि पानाच्या टपरीवर जाऊन पान खाल्ले, अशी कबुली त्याने तपासी अधिकारी नितीनकुमार गोकावे यांच्यासमोर दिली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली. राहूल शेळके याने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये गणेश भानुदास शेळके, अक्षय पोपट कांडेकर यांनाही अटक करण्यात आली आहे. यातील गणेश शेळके पोलिस दलात वाहनचालक असल्याचे समजते