आज २४ एप्रिल. दर्जेदार मराठी चित्रपटांचे दिग्गज निर्माते, ख्यातनाम दिग्दर्शक आणि प्रतिभाशाली अभिनेता म्हणून ज्यांना अभिमानाने गौरवण्यात आले, त्या ‘राजाभाऊ परांजपे’ यांची आज जयंती.
मराठी चित्रपटसृष्टी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही, राजाभाऊंनी खूप भव्यदिव्य अशी कामगिरी केली. राजा परांजपे यांच्या चित्रपटसृष्टीतल्या सुवर्ण काळाबद्दल बोलायचं झाले तर तो वासंतिक बहराचा काळ होता असं म्हणता येईल. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा तिहेरी व्यक्तित्वाने राजाभाऊ हे गदिमांच्या काव्य भाषेतील एक ‘भारलेले झाड’ होते.
मराठी चित्रपटांची निर्मिती करताना, चित्रपटाच्या संहितेचा गाभा कौटुंबिक राहील तसेच त्यात समाजभानही जागृत राहील, याची ते सतत काळजी घेत. राजाभाऊंचा कोणताही चित्रपट घ्या, मग तो ‘ऊन पाऊस’ असो किंवा ‘लाखाची गोष्ट’ अथवा ‘पेडगावचे शहाणे’ असो, या साऱ्या सार्यातून तुमच्या आमच्या घरातीलच गोष्ट चालू आहे असंच सतत जाणवत राहतं.
यशाच्या परमोच्च शिखरावर पोहोचूनही तद्दन मसाला चित्रपट न काढता, दिग्दर्शक म्हणून स्वतःचे कलासक्त मन जपणे, ही अत्यंत अवघड कला चित्रपट करताना त्यांना अवगत झाली होती.
‘ऊन पाऊस’ तसेच ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटांचे कथानक तर इतके जबरदस्त होते की पुढे ‘ऊन पाऊस’ वरून ‘बागवान’ व ‘तू तिथे मी’, तसेच ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटावरून काही अंशी ‘सदमा’, या चित्रपटांच्या निर्मात्यांना, राजाभाऊंच्या चित्रपटांच्या कथांची प्रेरणा घेण्याचा मोह आवरला नाही. राजाभाऊंच्या चित्रपटांचा हिंदी चित्रसृष्टीवर असा विलक्षण प्रभाव होता. ‘पाठलाग’ हा सिनेमा राज घोसला यांना तर इतका आवडला की त्यांनी या चित्रपटाच्या आधारे, हिंदी मध्ये ‘मेरा साया’ या नावाने हा चित्रपट काढला.
‘जगाच्या पाठीवर’, ‘हा माझा मार्ग एकला’ सारख्या चित्रपटांतील त्यांच्या प्रमुख भूमिका खूप परिणामकारक ठरल्या…’जगाच्या पाठीवर’ मधील अतिशय सज्जन, पापभीरू स्वभावाचा आणि जगात फक्त चांगुलपणाच आहे यावर नितांत विश्वास ठेवणाऱ्या विनायकाची भूमिका, आजही रसिकांच्या कायम लक्षात आहे. या चित्रपटाच्या शेवटी कोर्टसीनमध्ये विनायक हा गुन्हेगार म्हणून उभा असतो, तो सीन तर राजाभाऊंच्या कसदार अभिनयाची उंची गाठणारा आहे असे म्हणता येईल. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या लोकप्रिय चित्रपटातील एका कोकणी माणसाची भूमिका देखील राजाभाऊंनी बरहुकुम साकारली होती.
चित्रपटात फक्त रूपाने छान दिसण्यापेक्षा आपल्या सशक्त अभिनयाने प्रभाव पाडावा असं मानणारे राजाभाऊ परांजपे होते. यानुसार ‘जगाच्या पाठीवर’ ह्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव व स्वतः राजाभाऊ या दोघांनीही, त्यांच्या भूमिका प्रभावी होण्यासाठी मेकअपशिवाय व अतिशय साध्या, मळकट कपड्यात काम केले होते.आता वास्तववादी चित्रण करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केले जातात. पण या सर्वांची बिजे राजाभाऊ परांजपे यांनी आधीच रोवली होती, हे विशेष उल्लेखनीय आहे.
चित्रपटाचे कथानक गंभीर असो किंवा विनोदी असो राजाभाऊंच्या अभिनयाला कोणत्याही मर्यादा नव्हत्या. त्यांच्या चित्रपटातील गीते ही बहुतांशी वेळा गदिमांची असत तर संगीत बाबूजींचे असे. जणू त्रिगुणात्मक दत्तात्रयाची हि तिन्ही रुपे अवतरली होती. या तिघांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीत अवतरली आणि या त्रिमूर्ती दत्तात्रयाने मराठी चित्रसृष्टीला वैभवाचे, मानाचे स्थान बहाल केले. ‘जिवाचा सखा’ हा चित्रपट या त्रयींचा पहिला चित्रपट होता.
राजाभाऊंना संगीताचे उपजतच अंग होते. 1948 ते 1970 या काळात ते मराठी चित्रपटाचे अनभिषिक्त सम्राट होते असे गौरवाने म्हणता येईल. राजाभाऊ उत्तम पेटीवादन करीत, उत्तम कॅरम खेळत. पुण्यात तर त्यांनी कॅरमचॅम्पियन म्हणून नावलौकिक कमावला होता. ‘लपंडाव’ या नाटकात बदलीच्या भूमिकेसाठी राजाभाऊंच्या चेहऱ्याला जो रंग लागला तो अगदी शेवटपर्यंत राहीला. ‘सावकारी पाश’ मध्ये त्यांची नायकाची मित्राची भूमिका खूप गाजली.
चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांना राजाभाऊंनी गुरू मानले होते. भालजींची व राजाभाऊंची प्रथम भेट अगदी प्रसिद्ध आहे. त्याचं असं झालं की एकदा भालजींच्या समोर चौदा-पंधरा वर्षाचा एक मुलगा आला व त्यांच्या मुकपटांमधे, ऑर्गन अथवा पेटी वादन करण्याची इच्छा व्यक्त केली. भालजींनाही असा वादक हवाच होता. पण ऑर्गन अथवा पेटीवादन करण्याच्या बदल्यात त्या मुलाला मानधन किती देऊ असा प्रश्न भालजींनी विचारला . त्रायावर तो मुलगा म्हणजे राजाभाऊ म्हणाले कि मला मानधन वगैरे काही नको.
फक्त मला तुम्ही येथील चित्रपट मोफत पहावयास द्या इतकी माफक मागणी राजाभाऊंनी भालजींकडे केली. यातूनच भालजींनी त्यांचे चित्रपट प्रेम ओळखले व त्यांना संधी दिली. पुढे भालजींनी ‘थोरातांची कमळा’, ‘सुनबाई’ अशा अनेक चित्रपटात राजाभाऊंना भूमिका दिल्या. भालजींच्या बहुरूपी व बहुरंगी दिग्दर्शन कौशल्याने राजाभाऊ अक्षरशः भारावून गेले व त्यांनी भालजींचा गुरुमंत्र घेतला.
‘बलिदान’ हा राजाभाऊंनी दिग्दर्शित पहिला चित्रपट. पण या चित्रपटाची सिनेरसिकांनी फारशी दखल घेतली नाही. मात्र दिग्दर्शक म्हणून राजाभाऊंचे नाव पुढे आले. ‘ऊन-पाऊस’ हा चित्रपट हा एका इंग्रजी कथेवर बेतलेला होता. या कथेला मराठी संस्कृतीचे वळण देण्यात राजाभाऊ यशस्वी झाले. या चित्रपटास राष्ट्रपती पुरस्कार वगैरे मिळाला नाही, पण आजही अत्यंत सरस व उत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘ऊन पाऊस’ या चित्रपटाची गणना होते. या चित्रपटातील बापूमास्तरांची, अतिशय संवेदनशील व सत्शील माणसाची भूमिका, राजाभाऊंनी सहजपणे साकारलेली आपल्याला पहायला मिळते.
मराठी चित्रपटसृष्टीत नानासाहेब फाटक व गणपतराव जोशी अशा समृद्ध अभिनेत्यांचा वारसा जपणारे आणि भालजींच्या दिग्दर्शनकौशल्याची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावरून वाहणारे राजाभाऊ परांजपे, हे अत्यंत कर्तृत्ववान व प्रतिभाशाली चित्रकर्मी होते . राजाभाऊंचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्यातील विद्यार्थी कायम जागा ठेवला. त्यामुळे चित्रपट तयार करताना सभोवतालच्या वातावरणातील परिस्थितीचे अचूक निरीक्षण त्यांचे कायम चालू होते.
राजाभाऊंच्या चित्रपटांमध्ये प्रसंगोचित गाणी तसेच आशयघन शब्द, भावपूर्ण संवाद, सुरेल गीते, अचूक दिग्दर्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम दर्जाच्या अभिनेत्यांची मांदियाळी, असे यशस्वितेचे गमक असे. मनाची पकड घेणारे व अंतर्मुख करणारे असे चित्रपट राजाभाऊंनी निर्माण केले. चित्रपट तयार करताना येणाऱ्या समस्या तसेच त्यातील अकल्पित आव्हाने, त्यांनी लिलया जिंकली. दिग्दर्शन करताना त्यातील कथेचा गाभा हळुवारपणा जपणे हे राजाभाऊंचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाला राष्ट्रपती पदक व महाराष्ट्र राज्य शासनातर्फे नऊ पुरस्कार मिळण्याचे अहोभाग्य लाभले. राजाभाऊंची मेहनत सार्थकी लागली. पुढे ‘पाठलाग’ हा रहस्यमय मराठी चित्रपट त्यांनी काढला आणि या चित्रपटाला देखील राजाभाऊंना राष्ट्रपती पदक मिळाले. मानवी मनाची अस्वस्थता असा अत्यंत गहन विषय, त्यांच्या ‘पडछाया’ नामें चित्रपटाच्या कथानकाचा अविभाज्य भाग होता. हाताळायला अत्यंत कठिण अशा कथेच्या अनुषंगाने हा पूर्ण चित्रपट काढणे, हेही त्या काळातले पुढचं पाऊल होते असे म्हणता येईल.
‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली. ‘लाखाची गोष्ट ‘या चित्रपटातील प्रियकराची अवखळ भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. ‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटातील, निराश झालेल्या सरकारी नोकरीतील एका इंजिनिअरची भूमिका, राजाभाऊंनी आपल्या कसदार भूमिकेने अत्यंत यशस्वी केली. हिंदी चित्रपट सृष्टीतील ‘बंदिनी’, ‘चाचा चौधरी’ या सिनेमातील आपल्या भूमिकेचे राजाभाऊ यांनी सोने केले.
मराठी चित्रपटसृष्टीत इतका यशस्वी प्रवास करुनही, राजाभाऊंची मूळ आवड नाटक हिच होती. त्यामुळे जेंव्हा जेव्हा वेळ मिळे, तेव्हा ते नाटकातून आवर्जून काम करीत असत. ‘तुझे आहे तुझपाशी’, ‘उसना नवरा’, ‘लग्नाची बेडी’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी ज्या भूमिका केल्या त्या देखील वाखाणण्याजोगा होत्या. त्यांच्या अनेक चित्रपटांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शंकराचार्य यांजकडून राजाभाऊ यांना ‘चित्रपट सम्राट’ असा किताब देण्यात आला होता.
कसदार निर्मिती, संवेदनशील दिग्दर्शन आणि चतुरस्त्र अभिनयाने, मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करण्याऱ्या दीपस्तंभ रूपी राजाभाऊ परांजपे यांना अखिल महाराष्ट्राचा मानाचा मुजरा…
– दीपा देशपांडे
(मो: ९३७१०१८८५८)