माधव विद्वांस
“गर्जा महाराष्ट्र माझा’ हे सुंदर स्फूर्तिगीत रचणारे गीतकार राजा बढे यांची आज जयंती. लेखक, संपादक, चित्रपट अभिनेते, निर्माते, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1912 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण छिंदवाडा व माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक हायस्कूलमध्ये झाले. आईवडिलांच्या मृत्यूनंतर ते आपल्या भावंडांचे पालनपोषण करण्यासाठी मॅट्रिक झाल्यावर नोकरी करू लागले. भावंडांचे मार्गी लागावे म्हणून त्यांनी लग्नही केले नाही. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी नोकरी केली. काही नियतकालिके व साप्ताहिके यातूनही त्यांनी लेखन केले.
राजा बढे यांनी संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास केला होता. गीत, गझलबरोबरच “चारोळी’मध्येही त्यांनी रचना केल्या. “कोंडिबा’ हे टोपणनाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या. त्यांनी वर्ष 1940च्या सुमारास “सिरको फिल्म्स’च्या माध्यमातून चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. दोन वर्षे तेथे त्यांनी काम केले. वर्ष 1942 मध्ये ते “प्रकाश स्टुडिओ’त रूजू झाले. त्यांनी गीतकार म्हणून “रामराज्य’ चित्रपटाची गाणी लिहिली. तसेच महेश कौल यांच्यासोबत “अंगुरी’ चित्रपटातही काम केले.
“धाडिले राम तिने का वनी’ या नाटकासाठी त्यांनी अभिरामा सुखधामा हे भैरवी रागातील नाट्यगीत लिहिले व पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी ते गायले.आपल्या बंधूंच्या साहाय्याने “स्वानंद चित्र’ ही चित्रपट संस्था उभी केली आणि “रायगडचा राजबंदी’ हा संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. याच चित्रपटासाठी त्यांनी रचलेले “उधं गं अंबे उधं’ हे लोकगीत शाहीर पिलाजीराव सरनाईक यांनी गायले. आकाशवाणीवर “निर्माता’ म्हणून 1956 ते 1962 या कालखंडात त्यांनी काम केले. नोकरी सोडल्यावरही त्यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले.
1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली, यानिमित्त बढे यांनी रचलेल्या “गर्जा महाराष्ट्र माझा’ या भूप रागातील स्फूर्तिगीताला श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले आणि शाहीर साबळे यांनी त्यांच्या बुलंद आवाजात ते गायले. त्यांनी रचलेली “कळीदार कस्तुरी पान’ ही लावणी श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केली तर सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ढंगात गायली. त्यांच्या कवितेवर स्वा. सावरकरांचा प्रभाव दिसून येतो. “क्रांतिमाला’ या संग्रहात देशभक्तिपर 21 कविता आहेत. महाराष्ट्रात कथाकथनाच्या कार्यक्रमाची सुरुवात राजा बढे यांनीच केली. त्यांच्या साहित्य संपदेमध्ये अठरा काव्यसंग्रह, चार नाटके, नऊ संगीतिका, पाच एकांकिका, एक कादंबरी यांचा समावेश आहे. राजा बढे यांनी 7 एप्रिल 1977 रोजी अखेरचा निरोप घेतला.