मुंबई : एकीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापत आहे. या निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झालेल्या नसल्या, तरी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीसह आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आगामी निवडणुकांसाठी मनसेकडून सध्या जोरदार पक्षबांधणी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांना दिलेला सूचक इशारा दिला आहे. विक्रोळीतील मनसे शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरेंनी,”आपण सध्या फार काही बोलणार नसून दारूगोळा साठवून ठेवतोय, असे सूचक विधान केले आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी “विक्रोळीच्या सर्व बांधवांनो आणि भगिनींने.. मी सगळ्या ठिकाणी भाषण करत नाही. कारण कधीही निवडणुका लागतील. दारुगोळा साठवून ठेवलेला बरा. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बोललंच पाहिजे अशातला भाग नाही. पण तुम्ही सगळे इथे आलात. फक्त तुमचं दर्शन घेण्यासाठी मी व्यासपीठावर आलोय”, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
तसेच “जेव्हा निवडणुका लागतील, तेव्हा मी प्रत्यक्ष आपल्यासमोर येईन आणि ज्याची जी फाडायची, ती फाडीनंच. पण सध्या तुम्ही या महोत्सवाचा आस्वाद घ्या”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी जाहीर इशाराच विरोधकांना दिला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये मनसे अधिक आक्रमक होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.