मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वच पक्षांनी आपल्याला मिळालेल्या ग्रामपंचायतींचा आकडा माध्यमांसमोर सांगितला. १३ हजारहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक झाली असून यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्यासाठी एक खास मॅसेज दिला.
राज्यातील बऱ्यापैकी ग्रामपंचायती मनसेनं ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईजवळच्या ग्रामपंचायतीसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आपलं अस्तित्व दाखवून दिलं. पक्षाच्या या कामगिरीवर राज ठाकरे आनंदी असून त्यांनी ट्विट करत लवकरच तुम्हा सगळ्यांना भेटणार असल्याचं नवनिर्वाचित सदस्यांना सांगितलं.
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 20, 2021
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या, असं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.