मुंबई – राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. परंतु, राज्यपालांनी परीक्षा घेण्याचा आग्रह केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.
काय आहे राज ठाकरे यांचे पत्र?
राज्यात कोरोनाची परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आलं आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे या भागात किती दिवस लॉकडाउन राहिल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कुणासाठी?
या रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्ही देखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांचे आरोग्य धोक्यात घालण्यामागे नक्की प्रयोजन काय? दोन महिन्याचा लॉकडाउन देशाने सहन केला. जीव वाचला तर पुढे सगळे शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे?
परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे असं होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयात घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणाच्या आधारे निकाल लावता येईल. मला खात्री आहे की, शिक्षणतज्ज्ञांनी या विषयी मार्गदर्शन केले असेल. जर तसे नसेल तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना या विषयी नक्की मार्गदर्शन करेल.
निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये.
नमस्ते