मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाचा आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील घडामोडींवर कोणतेही त्यावर भाष्य करु नका असा आदेश दिला आहे. त्यातच आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे.
वांद्रे येथील ‘रंगशारदा’मध्ये पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करा असा आदेश दिला. निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करु असेही ते म्हणाले. तसेच सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत, लोक पर्याय म्हणून आपला विचार करतील, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा असे सांगत त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा अशी सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना केली आहे.
“मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिवसेनेला सहानुभूती मिळतीये हा भ्रम आहे असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सहा ‘एम’चा फॉर्म्यूला दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स या सहा ‘एम’वर लक्ष केंद्रीत करण्यास पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले “दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. तिथे फक्त चिखलफेक होत होती, कोणतेही विचार मांडले नाहीत. त्यामुळे आपले सकारात्मक तसंच हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा”,असेदेखील यावेळी त्यांनी म्हटले.
बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की “आजची अत्यंत महत्त्वाची बैठक होती. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा अनेक शहरांमधून पदाधिकारी आले होते. राज ठाकरेंनी त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सकारात्मक विचार ठेवून निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे. तसेच स्वबळावर निवडणूक लढवण्यासंबंधी चर्चा सुरु असून, अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर अजून चर्चा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील स्थिती पाहता लोक राज ठाकरेंच्या मनसेला प्राधान्य देतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.