मुंबई – राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची असे सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? हे सरकार कशासाठी कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्यामुळेच राज्यपालांना निवेदन दिले आहे. मात्र, राज्यपाल आणि राज्य सरकारमधील सख्य पाहता हे विषय कधी मार्गी लागतील सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना एक निवदेन दिले. त्यात शेतकऱ्यांच्या दुधाला भाव आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था शेतकऱ्यांना एका लिटरमागे 17 ते 18 रुपये देतात. स्वत: मात्र भरघोस नफा कमावतात. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळामुळे आधिच शेतकरी गांजलेला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल खर्चही वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 27 ते 28 रुपये दर मिळावा, अशा मागणीचे निवेदन राज्यपाल कोश्यारी यांना दिले.
त्याचबरोबर वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन आम्ही पाठपुरावा करत आहोत. पण सरकारकडून मिळणारा अपेक्षित प्रतिसाद खूप प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून आपण या विषयात लक्ष घालून सरकारला निर्देश द्यावे आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
शरद पवारांशी बोलून घ्या…!
वाढीव वीज देयकांबाबत सरकार, एमईआरसी आणि वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या एकमेकांकडे बोट दाखवतात. खरंतर या तिघांमध्येही समन्वय नाही. तुम्ही (राज्यपाल) या विषयात लक्ष घाला, असे राज ठाकरे राज्यपालांना म्हणाले. यावेळी राज्यपालांनी ऊर्जामंत्र्यांशी आणि त्या विभागांशी बोलतो असे आश्वासन राज ठाकरे यांना दिले. आणि जाता जाता राज्यपाल म्हणाले, तुम्ही या विषयावर शरद पवार यांच्याशीही एकदा बोलून घ्या, कारण या सरकारमध्ये शरद पवार हेच सगळे निर्णय घेतात.