विरोधी पक्ष एकजुटीने मुकाबला करेल
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढून सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआयअसेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
मागील लोकसभा निवडणुकीत, शिवाय राज ठाकरे सरकारच्या विरोधात काही प्रश्न निर्माण करतात, भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण व्हावी म्हणून ही नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आली आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
सत्ताधारी विरोधकांना अशाप्रकारे संपवत असतील तर विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की एकजुटीने याविरोधात एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे असे सांगतानाच आम्ही एकत्र येवू असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
देशातील, राज्यातील जनता हे सर्व पहाते आहे. निश्चितच सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या भाजप सरकारला देशातील व राज्यातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.