मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेमधून त्यांनी चौफेर टोलेबाजी करत, मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर निशाणा साधणाऱ्यांना राज ठाकरेंनी चांगलेच फैलावर घेतले होते.
दरम्यान, त्यानंतर आता राज ठाकरे कोकण दाखल झाले आहेत. आज पासून त्याचा कोकण दौरा सुरु झाला असून, यावेळी त्यांनी रत्नागिरीतील राजापुरात तालुका कार्यालयाचे उदघाटन केलं असून, मनसैनिकांना देखील संबोधित केलं आहे. “तुम्हालाही पैशाची अमिषे आलेत. कुणा कुणाला ऑफर आल्या हे मला माहीत आहे. तरीही तुम्ही फुटले नाहीत. याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.
तसेच ते म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात राजकारणात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. परंतू माझा महाराष्ट्र सैनिक हलत नाहीय, मला त्यांचा अभिमान वाटतो आणि मला तुमचं कौतुक देखल आहे”. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
मी जानेवारीत पुन्हा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणच्या विकासापासून ते हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत सर्वच विषयांवर बोलणार मी बोलणार असून, मुंबई आणि ठाण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांची पाईपलाईन तुंबलीय. पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये ती मोकळी होईल. त्यापूर्वी मी कोकणात येणार आहे’. असं ते म्हणाले. त्यामुळे नव्या वर्षात राज ठाकरे यांची तोफ कोकणातून धडाडणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.