मुंबई – देशातील सर्व 18 वर्षांपुढील सर्व नागरिक एक मे पासून करोना प्रतिबंधक लस घेण्यास पात्र असतील. सर्व संबंधितांना स्थानिक गरजेनुसार लसीकरणात लवचिकता देण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील धोरणानुसार लसीकरणाचा हा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केला. या निर्णयाचे ठाकरे सरकारने स्वागत केले आहे. परंतु, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
राज ठाकरे, आपण एका पत्राने केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. अपुनने एकही मारा लेकीन सॉलिड मारा के नही?,” असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या काळात राजकारण न करता महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभा असणारा एकमेव राजा, असा राज ठाकरे यांचा उल्लेख शिंदे यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. राज ठाकरे यांनी या पत्रामधून मोदींसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. त्यांनी यामध्ये राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली होती. तसेच महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण करावे, त्याचबरोबर खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी, अशा मागण्या त्यांनी मोदींकडे केली होत्या.
यावर लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तिसऱ्या टप्प्यात सर्व 18 वर्षांपुढील सर्व नागरिक एक मे पासून करोना प्रतिबंधक लस घेण्यास पात्र असतील, असा पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतला आहे.