मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे अयोध्येला जात आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमधील मशिदीवरील भोंगे बंद आहेत का? हे तपासावे. राज ठाकरेंनी एखाद्या मशिदीच्या बाजूला बसून तिथले भोंगे किती वेळ चालतात, हे बघावे. गुजरात आणि मध्य प्रदेश तसेच भाजपशासित इतर राज्यात जाऊनही भोंगे सुरु आहेत का बघावे. तिथे भोंगे बंद केलेले नसतील तर महाराष्ट्रात तसा आग्रह धरण्याचा कुठलाही नैतिक अधिकार भाजपला राज ठाकरेंच्या मागे दडून आहे, असे मला वाटत नाही.
तसेच सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की, ठराविक डेसिबलच्या आत स्पीकरचा आवाज असेल तर त्याला परवानगी दिलेली आहे. भारतात आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मशिदीवरील किंवा कुठल्याही ठिकाणच्या भोंग्यावर आवाज सुरु असेल तर त्याला कोर्टाची परवानगी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे आता अयोध्येला चालले आहेत. तिथे ते दर्शनासाठी जात आहेत की भोंगे वाजवायला जात आहेत, याबद्दल त्यांचा नक्की कार्यक्रम माहीत नाही. पण राज ठाकरेंनी भाजपचे बाहुले बनून काम करण्यास सुरूवात केलेली आहे. त्यामुळे त्यांची सुसज्ज अशी व्यवस्था योगी आदित्यनाथ यांनी केलेली दिसते, असेही ते म्हणाले.
“मी माझ्या घरी गणपती बसवतो, हे वृत्तवाहिन्यांवर अनेकदा दाखविण्यात आलेले आहे. आमच्या पक्षातले अनेक नेते देवधर्म करतात, त्यावेळी त्याचे प्रदर्शन होतेच. मात्र, आम्ही मतं मागायला लोकांपुढे जात असताना धर्माची भूमिका घेऊन जात नाही, हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. आम्ही हिंदू आहोतच. कदाचित त्यांच्यापेक्षा आमच्या घरात जास्त कडक पद्धतीने हिंदू धर्म पाळला जात असेल. पण याचा अर्थ आम्ही आमचे हिंदुत्व घेऊन रस्त्यावर फिरावे आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष सुरु करावा, अशी आमची भूमिका नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
फोन टॅपिंगच्या घटना मागील भाजप सरकारच्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाल्या, अशी माहिती समोर आली. त्याची चौकशी सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी फोन टॅपिंगमध्ये कसा सहभाग घेतला, याचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या अधिकाऱ्यांना फोन टॅपिंग करायला कुणी सांगितले? कोणत्या राजकीय नेत्याने, कोणत्या मंत्र्याने आणि कोणत्या अधिकाऱ्याने फोन टॅपिंग करण्यास सांगितले याचा खुलासा महाराष्ट्राला आणि भारताला होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.