मुंबई – राज्य सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घाबरत असावे, म्हणूनच त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई केली गेली नाही असा आरोप कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी आरोप केला आहे. राज्यातील जातीय तणाव भडकवण्यापासून त्यांना रोखणे आवश्यक आहे, असे सांगून निरूपम यांनी राज ठाकरे यांच्या त्वरीत अटकेची मागणी केली आहे. त्यांनी मनसे प्रमुखांविरोधात कारवाई न केल्याबद्दल मुंबई पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबादच्या सभेसाठी 16 अटी ठेवल्या होत्या, त्यापैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. तरीही त्यांच्यावर अटकेची कारवाई होत नाही हे राज्य सरकार त्यांना घाबरत असल्याचेच लक्षण मानले पाहिजे असे ते म्हणाले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
मी सरकारला घाबरू नका असे आवाहन करतो. देशात आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल, त्याला कठोरपणे सामोरे जावे,अशी सुचनाही निरूपम यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील न्यायालयाने प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली 2008 च्या एका प्रकरणात राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यापूर्वी 3 मे रोजी सांगली न्यायालयाने 2008 च्या खटल्यात ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या दोन्ही प्रकरणांच्या अनुषंगानेही राज ठाकरेंच्या विरोधात त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.