मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
“राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे असे अनेक लोक आजपर्यंत शिवसेनेतून बाहेर पडले. पण शिवसेनेच्या मुळावर उठणं, शिवसेनेला संपवणं हे काम आजपर्यंत कुणीच केलं नाही. हे वाईट आहे”, असे सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी,”निवडणूक आयोगाचा असा निर्णय येऊ शकतो, यासाठी आम्ही आम्ही मानसिकदृष्ट्या तयारच होतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
“मुळात आम्ही सगळे मानसिक दृष्ट्या तयारच होतो की हे लोक असं कुटिल राजकारण करतील. हे लोक पाताळयंत्री आहेत आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना प्रमुख आणि नेत्यांची यावर बऱ्यापैकी चर्चा झाली आहे. ते चिन्ह नेमकं काय असावं, नाव काय असावं याबाबत दुपारच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल”, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.
“आता मला कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही. आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली. तरी आयोगाचं म्हणणं आहे की त्यांचे जास्त फॉर्म आले. मुळात एकनाथ शिंदे स्वत:कडे मुख्य नेता पद आहे असं सांगतात. पण शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे नोंद केलेल्या संहितेमध्ये मुख्य नेता असं कोणतं पदच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत पक्ष म्हणून निर्णय घ्यायचे अधिकार पक्षाच्या कार्यकारी प्रमुखांना आहेत. त्यामुळे ते अधिकार सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. मग एकनाथ शिंदे गट कोण आहे? ते कसा हा निर्णय घेऊ शकतात? पण जिसकी लाठी उसकी भैंस असते. सत्तेचा गैरवापर ते करत राहतील, पण लोक उफाळून येतील”, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे तसं पाहाता फारसा प्रश्न निर्माण होणार नाही, असे अंधारे यावेळी म्हणाल्या. “मला वाटतं चिन्ह, नाव यामुळे एवढी काही अडचण निर्माण होणार नाही. चिन्हासोबत आमचा भावनिक ऋणानुबंध आहे. पण राष्ट्रवादी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडली, त्यांना घड्याळ चिन्ह मिळालं तेव्हा ते रातोरात लोकांपर्यंत पोहोचलं होतं. वंचित आघाडीला कपबशी मिळाली, तेव्हा ती रातोरात लोकांपर्यंत पोहोचली होती. आता तर काळ अजून पुढे गेला आहे. आपण 5G च्या युगात आहोत. या काळात चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक हायटेक माध्यमं आहेत. उलट आत्ता शिवसैनिक अधिक त्वेषाने ते काम करतील”, असेदेखील सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.