मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शार्जील उस्मानी चर्चेत आला आहे. त्याच्या या वादग्रस्त कृतीमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने देखील शर्जीलवर कारवाई करणार असल्याचे म्हटले. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावलंय का ? सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं, अशा शब्दांत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात आला. राज ठाकरे स्वत: न्यायालयात हजर राहिले होते. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.
लॉकडाऊनमधील वीज बिलात सवलत देण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकार वीज बिल सवलत देण्यावरून मागे हटले आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी वीज बिल माफीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.