मुंबई (प्रतिनिधी)– लोकसभा निवडणूकीच्या मैदानात न उतरता केवळ भाजपाच्या विरोधात प्रचार करणारे राज ठाकरे यांची मनसे विधानसभा निवडणूक लढविणार किंवा नाही याबाबत संभ्रम कायम आहे. विधानसभेच्या निवडणूकीत मनसेचे इंजिन स्वतंत्रपणे धावणार कि आघाडीमध्ये सामील होणार, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते.
शुक्रवारी राज ठाकरे यांनी “कृष्णकुंज’ येथे मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यामध्ये निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. निवडणूक लढवायची झाल्यास किती जागांवर आपली तयारी आहे याची माहिती त्यांनी घेतली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत जिथे मनसेची ताकद आहे अशा शंभर जागा लढण्याचा निर्णय झाल्याचे समजते. मात्र त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. राज ठाकरे लवकरच आपली भूमिका जाहीर करतील असेही समजते.
मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मात्र राज ठाकरे यांनी सरकारविरोधात प्रचाराची जी राळ उडवून दिली त्या सभांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. पण मतदानात त्याचे प्रतिबिंब उमटलेच नाही. त्यानंतर ईव्हीएमविरोधात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आघाडी उघडण्याचाही चांगला प्रयत्न केला. विधानसभा निवडणुका या मतपत्रिकेवरच होत असतील तर ठीक पण ईव्हीएमवर झाल्ऐया तर त्यावर बहिष्कार घालण्याची भूमिका त्यांनी घेतली. पण इतर विरोधी पक्षांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही.