मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या खासगी आयुष्यातील एका अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. तिचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने अखेर मौन सोडत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
यासाठी शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राच्या अटकेनंतर प्लॅटफॉर्मपासून काही काळ दूर होती.
तिने गुरुवारी रात्री इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. ज्यात जेम्स थर्बर या लेखकाचे एक वाक्य दिसून येत आहे. रागात मागे वळून पाहू नका किंवा घाबरून येणाऱ्या काळाकडे पाहू नका उलट जागरूक राहून याकडे पाहा. आपण सध्याच्या वर्तमानामध्ये जगायला शिकले पाहिजे.
काय घडले आणि काय घडणार याबद्दल विचार करण्याऐवजी, आहे त्या वास्तवात जगले पाहिजे, असा या पोस्टमधील लेखकाच्या ओळींचा अर्थ आहे. शिल्पाने या पोस्टच्या माध्यमातून एकप्रकारे तिच्या मनाची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
अर्थात तिने पती राज कुंद्राला झालेल्या अटकेसंदर्भात किंवा एकंदरितच या प्रकरणासंदर्भात थेट कसलाही उल्लेख केलेला नाही. पण तिने येणारी सर्व आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.