मुंबई – यंदा दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार आहे. स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाईसह बांबूपासून आदिवासी महिलांनी तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाशकंदील भेट दिले.
विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी आकाशकंदील तयार करून राजभवन येथे पाठविले. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात राज्यपाल कोश्यारी यांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांबू प्रकल्पाला भेट दिली होती. त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली होती. अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली उत्पादने विकत घ्यावी, असे आवाहन करताना आपण राजभवनापासून याची सुरुवात करू, असे कोश्यारी यांनी सांगितले होते.