पुणे – आगामी विधानसभा निवडणूक रयत क्रांती संघटना कमळ चिन्हावरच लढविणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
विधानभवन येथे खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. विधानसभेच्या निवडणुकीबाबत येत्या 6 जूनला रयत क्रांती संघटनेची बैठक पुण्यात होणार आहे. या बैठकीत दुष्काळ, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि विधानसभेच्या भूमिकेबाबत या बैठकीत विचार मंथन करण्यात येणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहतील. आमची संघटना असल्याने आम्ही येणारी निडणूक कमळावरच लढविणार असल्याचे खोत यांनी सांगितले. मागील विधानसभेच्या निडणुका आम्ही महायुतीखाली लढलो होतो. आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही एकही जागेवर लढलो नाही. मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्षांना विधानसभेत जागा देऊ असे सांगितले आहे. परंतु, अद्याप याबाबत चर्चा झालेली नाही. आम्ही सर्व मित्र पक्ष एकत्रित बसून ज्या जागा निवडून येऊ शकतात, अशा जागा आम्ही लढवू शकतो, असेही खोत यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांचे मार्गदर्शन घेऊनच मी इथवर आलो
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी यांना मार्गदर्शन करणार का? असा प्रश्न खोत यांना विचारला असता ते म्हणाले, राजू शेट्टी यांचे मार्गदर्शन घेऊनच मी इथवर आलो आहे. मी खूप लहान कार्यकर्ता आहे. त्यांना मी मार्गदर्शन देणे योग्य नाही. तसेच, माझ्या मार्गदर्शनाची त्यांना आवश्यकता देखील भासणार नाही. खासदार म्हणून धैर्यशील माने यांना निवडून देण्याचे काम लोकांनी केले आहे. त्यामुळे आता शेट्टी यांनी काय काम करायचे ते त्यांनीच ठरवावे, असे खोत यांनी सांगितले.