कापूरहोळमध्ये आता ट्रॅक्टरने रब्बी पेरणी : औतालाही कमी मागणी
कापूरहोळ – येथील परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे रब्बीचा चालू हंगाम उशिराने सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्यामुळे आता वातावरणात उष्णता जाणवत आहे. सततच्या पावसामुळे अद्याप शेतीला वाफसा आलेला नाही; परंतु ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होणारी शेती आहे,त्या ठिकाणी शेतीला वाफसा आला आहे. जेथे पेरणी करण्यासारखी स्थिती आहे, त्या क्षेत्रात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी आणि मशागतीची कामे हाती घेतली आहेत. आळंदे, संगमनेर, कासुर्डी, इंगवली, कापूरहोळ, करंदी, निगडे, धांगवडी आदी गावांतून रब्बी पेरणीची ट्रॅक्टरच्या साह्याने कामे सुरू झाली आहेत.
आधुनिक काळात शेतीसाठी विविध अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि औजारांचा वापर होत असताना बैलांच्या साह्याने शेतीसाठीची कामे मर्यादित राहिली आहेत. रब्बी हंगामात ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी, फनपाळी होत असल्याने बैलांच्या औताला मागणी कमी झाली असून, परिसरात ट्रॅक्टरची संख्या वाढून बैलांची संख्या कमी झाल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात.
वर्षभर बैलांचा वैरण आणि खाद्याचा खर्च शेतकऱ्यांना अंगावर करावा लागत असल्याने बैल जोडीला फक्त पेरणीसाठीच अथवा भात लावणीच्या काळात चिखल करण्यासाठी मागणी होत असते, त्यामुळे तरुण शेतकरी बैल सांभाळण्यास तयार होत नाहीत. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्यातरी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे रब्बी हंगाम सुगीचा होईल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.
शेतीच्या कामासाठी वर्षभर बैल सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. म्हणून सध्या शेतीचे यांत्रिकीकरण करून ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करीत आहोत. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिक शेती किफायतशीर होत आहे. आधुनिक ट्रॅक्टर हे पाळी-पेरणीबरोबरच लहान ट्रॉली वाहतुकीसाठी उपयुक्त ठरत आहे.
-संतोष धावले, प्रगतशील शेतकरी, कासुडी गु.मा.