पाण्यासाठी महिलांचे रस्त्यावर : पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
महिलांचे मटका फोड
देहुरोड (वार्ताहर) – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील सिद्धिविनायक नगरी, श्रीविहार, दत्तनगर, सर्मथनगर परिसरातील मंजुरीत पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपाचे मावळ तालुका उपाध्यक्ष उमाशंकर सिंह यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि. 27) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तर महिलांनी मटका फोड करून आंदोलनात सहभागी झाले.
राज्य शासनाच्या निधीतून प्रथमच कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक 5 व 6 मधील सिद्धीविनायक नगरी, दत्तनगर (निगडी) भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 5.49 कोटी खर्चून पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत आहे. त्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सुमारे दहा लाख रुपये खर्च केले आहे. राज्य सरकारने पाणी योजनेस निधी वितरित करण्याऐवजी योजनेलाच स्थगिती दिली आहे. पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी तसेच तातडीने स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने सिद्धिविनायक नगरी येथे धरणे आंदोलन
करण्यात आले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, उपाध्यक्ष सिंह, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, माजी शहराध्यक्ष ऍड. कैलास पानसरे, बोर्ड सदस्य ललित बालघरे, विशाल खंडेलवाल, उद्योजक अमोल नाईकनवरे, दत्तात्रय काळभोर, प्रदीप बेंद्रे, सुनील खाणेकर, तुकाराम जाधव, अविनाश कोरडे, अनिल खंडेलवाल, सूर्यकांत सुर्वे, सुशीला नरवाल, परिसरातील नागरिक आणि महिला वर्ग यावेळी उपस्थित होते.
देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील निगडी येथील सिद्धिविनायक नगरी येथे महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान अंतर्गत प्रस्तावित पाणी योजनेसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 11 टक्के कमी दराची एक ठेकेदाराची निविदा स्वीकारण्यात आलेली असून, संबंधित निधी वर्ग करणेबाबत कॅंटोन्मेंट बोर्डाने राज्य शासनाचे नगरविकास विभागास पत्रही दिले आहे. मात्र निधी प्राप्त न झाल्याने कामाचे आदेश देण्यात आलेले नाहीत.
राज्य सरकारकडून संबंधित पाणी योजनेस स्थगिती दिली असल्याने पाणी योजना रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरू लागली आहे. राज्य सरकारने तातडीने कॅंटोन्मेंट बोर्डाच्या पाणी योजनेस दिलेली स्थगिती उठवावी व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावत दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली आहे. धरणे आंदोलनावेळी महिलांनी माठ फोडून आंदोलनात
सहभागी झाले.