महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी
पुणे – सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि राज्यसरकारातील अडीच लाख रिक्त पदे भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय विभागात सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत. दरवर्षी हजारो कर्मचारी सेवानिवृत्त होतात.
वित्त विभागात सहा हजार, कृषी पशुसंवर्धन विभागात 14 हजार, बांधकाम विभागात 9 हजार, जलसंपदा विभागात 21 हजार, महसूल विभागात 8 हजर, पोलीस यंत्रणेत 20 हजार, सार्वजनिक आरोग्य विभागात 21 हजार पदे रिक्त आहेत. तशातच गेल्या आठ वर्षांपासून नवीन भरतीचे प्रमाण अत्यल्प असून, राज्य सरकारने नवीन भरतीबाबत कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.
निवृत्तीचे वय वाढवून त्या जागा किमान दोन वर्षांसाठी राखता येऊ शकतात. अपुऱ्या मनुष्यबळावर प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती असताना प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्याबाबत सरकार गंभीर नाही. या जागा भरण्याबाबत सरकारने कालबद्ध कार्यवाही करावी, या विषयावर चर्चेसाठी वेळ द्यावा, अशीही मागणी महासंघाने केली आहे.