वीसगाव खोरे- पावसाळा सुरू झाला की रायरेश्वर पठारावर डोंगरउतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातींच्या, रंगांच्या, आकारांच्या या फुलांची जणू काही एक बहारदार शालूच सह्याद्रीच्या कडेपठारांनी परिधान केलेला असतो. काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंतचे आयुष्य असणाऱ्या या फुलांचे एक समृद्ध भांडारच सप्टेंबरअखेरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात एकदाच फुलते.
कवळा, रानहळद, गोकर्ण, काटेसावर, पिवळा धोत्रा, तेरडा, जांभळी मंजिरी, सोनतारा, घाणेरी, ऑर्किड,दाहण ही रानफुले मन मोहून घेतात. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना 51 कि. मी.वर भोर आहे आणि भोर- कोर्ले 25 कि.मी. तेथून पठार 8 कि. मी. असे एकूण 84 कि. मी. अंतर आहे.
1500 मीटर उंचीच्या एका विस्तृत पठारावर प्राचीन शिवस्थान आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली ही पावन भूमी आहे. या रायरेश्वर किल्ल्यावरून दिसणारे मनमोहक दृश्य म्हणजे एकाच नजरेत दिसणारे किल्ले तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, रोहिडा, कमळगड, केंजळगड होय, तसेच देवघर धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र, करोनाच्या संक्रमणामुळे सध्या येथे पर्यटनास बंदी आहे.