मुंबई – राज्यासमोर सध्या करोनाचे संकट उभे ठाकले असून दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन जवळपास महिनाभर पुढे ढकलले आहे. येत्या 22 जून रोजी हे अधिवेशन घेतले जाणार होते. मात्र करोनाचे संकट पाहता हे अधिवेशन 3 ऑगस्टपासून घेतले जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजाच्या सल्लागार समितीसोबत बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे तसेच मंत्री मंडळातील इतरही मंत्री उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशन किती दिवसांचे घ्यावे यावरही चर्चा झाली.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात सुरू असलेला करोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेता 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन होईल अशी शक्यता होती. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता निर्णय पुढे ढकल्यात आला आहे. पावसाळी अधिवेशन आता 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 15 दिवस चालणार आहे, असे ते म्हणाले.
तसेच पुरवणी मागणी मंजूर करून घेण्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन देखील घेतले जाऊ शकते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या अधिवेशनात दोन्ही सभागृहातील सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयास पाठिंबा दर्शविला आहे.
3 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन होईल. जर का पुरवणी मागण्या मंजुरी मिळवायची असेल तर एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे. त्यासाठी उपस्थिती अनिवार्य नसावी. यासाठी आमची अनुमती आहे, असे त्यांनी जाहीर केले.
…तर पुन्हा लॉकडाउन
राज्य सरकारने “मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावले टाकत आहे. कारण करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही. परंतु निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती चिंताजनक आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे, असे लक्षात आले तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल, अशा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.