कोरेगाव भीमा (वार्ताहर) -पेरणे फाटा (ता. हवेली) येथील विजयस्तंभ नगरात पावसाचे पाणी शिरल्याने गरिबांचे संसार पाण्यात बुडाले. आधीच मोडकळीस आलेल्या झोपडीत पाणी शिरल्याने मुलाबाळांना कुठे न्यावे, कुठे आसरा घ्यावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तर जीवनावश्यक वस्तू भिजल्याने नागरिकांचे हाल झाले.
पावसाचे पाणी त्यांच्या झोपडीत साठल्याने त्यांना घरात नीट उभेही राहता येत नव्हते. करोनाच्या काळात हाताला काम नाही, बॅंकेत शिल्लक नाही त्यात पावसाने वाताहत केल्याने आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.
विजयस्तंभ नगरमध्ये सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते बनवलेत; पण त्यामधून सांडपाण्याची लाइन न टाकता पक्के रस्ते बनवण्यात आले आहेत. मात्र, सांडपाणी वाहिनी नसल्याने सर्व पाणी रस्त्याने वाहत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच दररोजचा कचरा येथे टाकण्यात येत असून पावसाच्या पाण्याने भिजल्याने त्याची दुर्गंधी सुटली आहे.