दरवर्षी उद्भवणारी समस्या सोडविण्यासाठी रहिवाश्यांची थेट खासदारांकडे धाव
येरवडा (प्रतिनिधी) :- वाघोली रस्त्यावर कर्मभूमी नगर जवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. दरवर्षीच या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही समस्या आता खासदारांनी सोडवावी, यासाठी येथील रहिवाश्यानी खासदार गिरीश बापट यांना निवेदन दिले आहे. या रस्त्यावर पावसाळी ड्रेनेजलाईनचे काम करावे असे निवेदन कर्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मोहनराव शिंदे, धनंजय जाधव, सुनील खांदवे, दिपक खांदवे, स्वप्नील खांदवे, पांडुरंग खांदवे, दीपक शर्मा, गौतमकुमार, सुजीत बेनाडी आदी उपस्थित होते.
लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमी नगर जवळ दरवर्षी पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. या पाण्याचा निचरा होत नाही. लोहगाव-वाघोली रस्त्याचा पलीकडील भाग प्रभाग क्रमांक तीन विमाननगर भागात येतो. तर अलीकडील भाग नव्याने समावेश झालेल्या प्रभाग ४२ मध्ये येतो. या रस्त्यावर अद्याप पावसाळी लाईन झाली नाही. लोकप्रतिनिधी या भागाकडे लक्ष देत नाहीत. कर्मभूमी जवळ सखल भाग असल्याने याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला नैसर्गिक रित्या पाणी वाहून जाण्याच्या ठिकाणी बांधकामे झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून रहाते. संततधार पावसामुळे पाणी गुडघाभर साचत असून अर्धा किमी परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. वाहन चालक, पादचारी नागरिक या पाण्यातूनच वाट काढत जात आहेत. कायमस्वरूपी समस्या मार्गी लावावी अशी मागणी होत आहे.
अॅड. सुरेश जाधव म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यशवंत शितापे म्हणाले, दरवर्षी समस्या आहे, मात्र नगरसेवक, महापालिका अधिकारी लक्ष देत नाही. दरवर्षी तात्पुरती उपाय योजना केली जाते, अन पावसाळ्यात पुन्हा आहे ती समस्या निर्माण होत आहे. लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून येथील पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढावी.
खासदार गिरीष बापट यांनी पाहिली समस्या…
खासदार गिरीष बापट हे एका कार्यक्रमासाठी धानोरी येथे आले असता येथील रहिवाश्यानी त्यांना येथील परिस्थिती पाहण्याची विनंती केली असता, त्यांनी ती मान्य करून त्यांनी लोहगाव-वाघोली रस्त्यावरील पाणी साचणाऱ्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी आपण लक्ष घालून ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.