तांत्रिक अडचणीने एक लाख लिटर पाणी वाया- जलशक्ती चळवळीला मिळेना लोकाश्रय
सातारा – भूजल पुनर्भरण व्हावे, यासाठी घराच्या बांधकामास परवानगी देताना “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य याबाबतचा नियम पूर्वीपासून असताना सातारा शहरात कागदावरच राहिला. त्यामुळे नगररचना विभाग करतो काय? असा आरोप होत आहे. केवळ भोगवटदार प्रमाणपत्रधारक नागरिकांची नोंद या विभागाकडे आहे.
नागरिकांना याचे गांभीर्य कळले नसल्यानेही शहराच्या भूजलात घट झाली. आता पुन्हा नागरिक जलसंधारणाकडे वळतील अशी उपाययोजना होत नसल्याने सातारकर पाणी वापराच्या बाबतीत किती गंभीर आहेत हे स्पष्ट झाले आहे. अलीकडच्या दोन महिन्यांत तब्बल एक लाख लिटर पाणी तांत्रिक अडचणी व गळतीमुळे वाया गेल्याचे समोर आले आहे.
भूजल पातळीत झपाट्याने घट होणाऱ्या शहरांमध्ये साताऱ्याचा क्रमांक आहे. यानिमित्ताने मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी जबाबदारी निश्चित केलेली आहे. कार्यकारी अभियंता-2 यांना प्रत्येक झोनमधील विहिर, बोअरवेल व तलावाचे पुनर्जीवन, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतींना “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक करण्याबाबत सूचना देणे व संबंधिताना याविषयी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर अभियंत्यांद्वारा सर्व अभियंत्यांना प्रतिमाह 100 “रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सातारा पालिका व झोन कार्यालयाद्वारा बांधकाम परवानगी देताना “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करणे बंधनकारक केले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांद्वारा सर्व शाळांमध्ये “रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या जनजागृती करण्यासाठी विशेष नियोजन राबविण्यात येत आहे. पालिकेच्या शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रेरक म्हणून नेमले आहे. शाळा परिसरातील नागरिकांची रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
सर्व खासगी व शासकीय मालमत्तांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे जिओ टॅग, फोटो व व्हिडीओ चित्रण मोबाईर्लद्वारे करण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या इतर अ वर्ग पालिका क्षेत्रात दिले जात असताना सातारा शहरात वॉटर हार्वेस्टिंगचे शून्य काम आहे. मागील काळात आलेली मरगळ आता कास धरण उंची कामाच्या निमित्ताने झटकणे गरजेचे आहे. हार्वेस्टिंग मोहीम आता गतिमान करण्यासाठी सामूहिक लोकसहभाग व राजाश्रयाची गरज आहे. मात्र, हे राजकीय भान पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना नाही आता “जलशक्ती’ अभियानाला उचलून धरण्याची गरज आहे.
सातारा शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाणी गळतीचे सत्र सुरू आहे. पाणी बचतीच्या लोकचळवळीला बळ मिळणे आवश्यक आहे. वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या मिळकतींना 10 टक्के घरपट्टी सवलतही देण्यात आली आहे. नागरिकांचा याला सकारात्मक प्रतिसाद आहे. आता जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून ही मोहीम व्यापक करण्यात येऊन सर्व माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येत आहे. वॉटर हार्वेस्टिंगची जलसंवर्धन चळवळ रुजवण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे.
– शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषदशहराचे भूजल पुनर्भरण होणे महत्त्वाचे आहे. यामध्ये माघारलेल्या पालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात जलसंधारण प्रबोधनाची मोहीम राबवण्यात आली होती, मात्र जुनच्या ऐन टंचाईच्या काळात घंटेवारीतील दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. साताऱ्यात पाण्याची प्रचंड मुबलकता असल्याने सातारकर पाणी बचतीच्या बाबतीत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. नगरपालिकेच्या इमारतीवरच वॉटर हार्वेस्टिंग उभे करण्यात पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घ्यावा नाही तर पाणी बचतीच्या केवळ फुकटच्या गप्पा होतील. आम्हीदेखील जलजागृती करीत आहेत. नागरिकांमध्ये “रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे महत्त्व पटले व त्यांच्यात सकारात्मक बदल झालेला आहे.
– भाऊसाहेब पाटील, मुख्य अभियंता, सातारा पालिका