सातारा – जावळी तालुक्यातील सायगावसह परिसरातील मोरघर, खर्शी, आनेवाडी तसेच वाई तालुक्यातील विरमाडे, कळंभे या गावांना शुक्रवारी दुपार चार वाजण्याच्या सुमारास आलेल्या पावसाने चांगलाच तडाखा दिला. सुमो अडीच ते तीन तास पडणाऱ्या या पावसामुळे ओढ्यांना पूर आले तर शेतांमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने शेताच्या ताली फुटून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवडाभरात सायगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या मात्र शुक्रवारी पडलेल्या पावसाने अनेकठिकाणी शेतजमिनीतील माती वाहून गेल्याने शेतकरी पुन्हा एका संकटात सापडला आहे.
निसर्ग चक्री वादळामुळे गेल्या आठवड्यापूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकून खरिपाच्या पेरणीलाही सुरुवात केली होती. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पाऊस येण्यापूर्वी पेरणी व्हायला पाहिजे यासाठी शुक्रवारीदेखील शेतकऱ्यांनी गडबड करुन शक्य होईल त्या पद्धतीने पेरणी केली. दुपारी चारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.
पावसाला सुरुवात झाल्याने प्रारंभी शेतकऱ्यांच्या चेहऱ्या समाधानाचे वातावरण होते.
मात्र सलग अडीच ते तीन तास मुसळधार पाऊस पडल्याने ओढ्यांना पूर आला. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले, तर काही ठिकाणी ताली फुटून जमिनी वाहिल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे समाधान काही वेळातच चिंतेत बदलून गेले. पावसामुळे सायगाव, खर्शी, आनेवाडी, विरमाडे, मोरघर, कळंभे, प्रभुचीवाडी तसेच परिसरातील इतर गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो रुपये खर्च करुन केलेली पेरणी वाया जाण्याची शक्याता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.