आणखी काही दिवस पाऊस सक्रिय राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांपासून देशात विविध राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांत देशात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
राजस्थान, उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा चांगलाच तांडव सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे आणि रस्ता वाहतुकीवरही वाईट परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या पावसाचे सर्वात जास्त बळी उत्तर प्रदेशात पडले आहेत. गुरुवारपासून उत्तर प्रदेशात 93 जणांचा मृत्यू झाला आहे. पाटणा, भागलपूर, कैमूर येथे झालेल्या अपघातात 18 मृत्यू झाले आहेत. तर उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात 13 जणांचा मृत्यू झाला असून गुजरातमध्ये पूरात 3 महिला वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशात म्हणजेच पुढचे काही दिवस मान्सून जोरदार सक्रिय आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.