धरणाच्या दरवाजांमधून विसर्ग बंद
पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाने उसंत दिली होती. कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी मंगळवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. केवळ पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरणात 103.51 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
गेल्या सहा दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. धरणातून होणारा विसर्ग थांबविण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने मंगळवारी दुपारी घेतला. पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात 22 हजार 162 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या सहा दिवसांत धरणाच्या दरवाजांमधून सहा टीएमसी पाणी विनावापर सोडले होते. मात्र, सध्या धरणाच्या दरवाजामधून विसर्ग करण्यात येत नाही. धरणाची पाणीपातळी 2162.02 फूट झाली आहे. गेल्या बारा तासात कोयनानगर 24 मिमी, नवजा 35 मिमी, महाबळेश्वर 20 मिमी, वळवण आठ मिमी, अशी पावसाची नोंद झाली.